कोलकाता, दि. 7 - भाजपामध्ये योगी, साध्वी असे काही नेते आहेत, ते बकवास करतात, त्यांना तुरुंगात टाकायला हवं, त्यांना पक्षातूनही हाकलायला हवं असं मत अनुपम खेर यांनी व्यक्त केलं आहे. टेलिग्राफ नॅशनल डिबेटमध्ये बोलताना त्यांनी राहूल गांधींसह भाजपाविरोधकांवर चांगलाच हल्ला चढवला. तसेच भाजपानेही पक्षातल्या वाचाळवीरांवर अंकुश ठेवायला हवा असे मत खेर यांनी व्यक्त केलं.माझी बायको भाजपाची खासदार आहे, परंतु मी तिच्याशी 30 वर्षे सुखाने संसार करत असल्यामुळे तिला खूश करण्यासाठी भाजपाचं कौतुक करण्याची मला गरज नसल्याचंही खेर म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी खरोखर चांगलं काम करत असताना, जाणूनबुजून त्यांना बदनाम करण्यासाठी असहिष्णूतेचं पिल्लू सोडण्यात आल्याचा आरोप त्यांनी केला. राहूल गांधींना सहन करणं ही सगळ्यात मोठी सहिष्णूता असल्याचं उपरोधिकपणे सांगत, या अंगाने काँग्रेसचे नेते सगळ्यात जास्त सहिष्णू असल्याचं ते म्हणाले.मोदींनी केलेला जबरदस्त पराभव काँग्रेसच्या जिव्हारी लागला असून एक चहावाला पंतप्रधान कसा होतो हे न पचल्यामुळे असे विषारी हल्ले करण्यात येत असल्याचे खेर यांनी सांगितले.आठ महिन्यांपूर्वी असहिष्णूता हा शब्दही कुणी ऐकला नव्हता, तो अचानक कुठून आला, असा प्रश्न विचारत खेर यांनी हे जाणुनबुजून रचण्यात आलेलं कारस्थान असल्याचा आरोप केला.
Subscribe to:
Post Comments (Atom)
Post a Comment